पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला..
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्दं आणिक यमक छंद करतील काय ?
डांबरी रस्त्यावर श्रावण इंद्रधनु बांधील काय ?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तीत जास्त बारा महीने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?
म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहचलेलं
शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
-कुसुमाग्रज
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment